Wednesday 24 November 2021

#हेल्पलाईन_1930

#हेल्पलाईन_1930





 दिनकर राव आज आनंदात होते. थोड्या वेळापूर्वी पेन्शन जमा झाल्याचा बँकेकडून एसेमेस आला होता. चांगल्या मार्क्स नी ग्रॅज्युएट झालेल्या त्यांच्या नातीला, सुमेधाला लॅपटॉप घेऊन देण्याचे त्यांनी कबूल केले होते. अचानक त्यांचा मोबाईल फोन वाजला. स्क्रीन वर अनोळखी नंबर झळकला. त्यांनी फोन घेतला. 


"गुड इव्हिनिंग सर ! मी बीएसएनएल ऑफिस मधून बोलतेय.." 

"बोला..." 

"सर, आपलं केवायसी अपडेट पेंडिंग आहे. त्यासंदर्भात कॉल केलाय..."

"तुम्ही उद्या कॉल करा ना..आत्ता मी घाईत आहे..." 

"सर, आज लास्ट डेट आहे...केवायसी अपडेट झालं नाही तर तुमची मोबाईल फोन सर्विस उद्यापासून बंद होईल.. फक्त दोन मिनिटांचं काम आहे..." 

"ओके... मला काय करावं लागेल ?" 


मोबाईल फोन बंद होण्याच्या भीतीने दिनकर रावांनी केवायसी अपडेट करायचं ठरवलं. 

"तुम्हाला एक एसएमएस येईल... त्यातील लिंक वर क्लिक करून एक फॉर्म दिसेल तो भरायचा आहे. मी फोन चालू ठेवते, तुम्ही बघा एसएमएस आलाय का ?" 

तिचं बोलणं सुरु असतानाच त्यांनी मेसेजेस चेक केले.  BZ-BXNLKC या नावाने एसएमएस आलेला दिसत होता. 

"हो...आलाय एसेमेस..." 

त्यांनी फोनवर बोलणाऱ्या मुलीला सांगितलं. 

"ओके...त्यात एक लिंक असेल, ती ओपन करा." 


त्यांनी एसएमएस मधली लिंक क्लिक केली. एक फॉर्म ओपन झाला. त्यात त्यांचे पूर्ण नाव, पत्ता आणि आधार कार्ड नंबर टाकायचा होता. फॉर्म भरल्यावर खाली एक बटन ऍक्टिव्हेट झालं. त्यावर Submit & Pay असं लिहिलेलं दिसत होतं. 

"ते खाली बटन दिसते...त्यावर Submit & Pay लिहिलंय... ते कशासाठी आहे ?"

"सर तुमचा फॉर्म  सबमिट होईल. तुम्हाला फक्त दहा रुपये लेट चार्जेस भरावे लागतील. त्यासाठी ते बटन क्लिक करा." 


फक्त दहा रुपये भरावे लागतील, म्हणून फारसा विचार न करता दिनकर रावांनी ते बटन क्लिक केले. बटन क्लिक केल्यावर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि यूपीआय असे पर्याय समोर आले. त्यांनी नेट बँकिंग चा पर्याय निवडला. 


कस्टमर आयडी आणि पासवर्ड टाकून त्यांनी दहा रुपये भरले. त्याबरोबर त्यांना एसएमएस आल्याचे नोटिफिकेशन मिळाले. 

"थँक्यू सर !  आता आपले केवायसी अपडेट झालेय. आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद." 

एवढे बोलून तिने फोन कट केला. 


मघा आलेला मेसेज कसला आहे? ते बघण्यासाठी म्हणून दिनकर रावांनी सहज मेसेज उघडला. मेसेज वाचून त्यांचे हात पाय थरथरू लागले... त्यांच्या बँक अकाउंट मधून दोन लाख डेबिट झाल्याचा तो मेसेज होता. बँकेतील आधी जमा असलेले दीड लाख आणि आत्ताचे पेन्शनचे पन्नास हजार असे एकूण दोन लाख कोणीतरी काढून घेतले होते.

थरथरत्या आवाजात त्यांनी सुमेधाला हाक मारली. सुमेधा धावतच त्यांच्या खोलीत आली. 

"काय झालं आजोबा ? बरं वाटत नाही का?"

त्यांनी तिला झालेला प्रकार सांगितला. 


अलीकडेच भारत सरकारच्या गृह खात्याने कुठलातरी हेल्पलाइन नंबर आर्थिक सायबर गुन्हा झाल्यानंतर वापरण्यासाठी लॉन्च केल्याची माहिती तिने कुठेतरी वाचली होती. पण नेमका तो नंबर तिला आठवत नव्हता. तिने ताबडतोब इंटरनेटवरून तो नंबर शोधून काढला 1930. 


दिनकररावांना त्यांच्या बँकेचे पासबुक मागून घेऊन, तिने तो नंबर डायल केला. तीन-चारदा डायल केल्यावर तो नंबर एकदाचा लागला. पलीकडून बोलणाऱ्या ने सुमेधाला दिनकर रावांचे पूर्ण नाव, त्यांच्या बँक अकाऊंट चे डिटेल्स आणि किती वाजता, किती पैसे काढले गेल्याचा एसेमेस आला ते विचारलं. सुमेधाने त्यांना पाहिजे ती माहिती दिली. 


थोड्या वेळाने दिनकर रावांच्या फोनवर या हेल्पलाइन कडून एक मेसेज आला. त्यात एक युनिक नंबर दिला होता. हा नंबर वापरून सायबर क्राईम पोर्टलवर वर तक्रार नोंदवावी असे निर्देश त्या मेसेज मध्ये दिले होते.

त्याप्रमाणे सुमेधाने त्यांच्याच मोबाईल वरून https://cybercrime.gov.in हे पोर्टल ओपन करून  सगळी माहिती भरून, हेल्पलाइन कडून आलेला युनिक तिकीट नंबर टाकून तक्रार नोंदवली.  


सायबर चोराने काढून घेतलेले दिनकर रावांचे सर्व पैसे तीन दिवसांतच पुन्हा त्यांच्या खात्यावर जमा झाले. 


भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने 2020 मध्ये 155260 ही हेल्पलाईन आर्थिक सायबर गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी सुरु केली. https://cybercrime.gov.in या पोर्टलशी ही हेल्पलाईन संलग्न आहे. सुलभते साठी आता हा 115260 हेल्पलाईन नंबर बदलून 1930 करण्यात आला आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत ही हेल्पलाइन 24 * 7 कार्यरत आहे. बाकीच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दहा ते सहा या वेळेत की हेल्पलाईन चालू असते. या हेल्पलाईन द्वारे बहुतेक बँका, काही मोठी व्यापारी प्रतिष्ठाने आणि वॉलेट जोडले गेले आहेत. 


हेल्पलाईन चे काम कसे चालते? 


आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीला फक्त हेल्पलाईन 1930 डायल करावी लागेल. त्यानंतर, एक पोलिस ऑपरेटर फसवणूकी च्या व्यवहाराचे तपशील आणि फसवल्या गेलेल्या व्यक्तीची मूलभूत वैयक्तिक माहिती नोंदवेल. 


त्यानंतर हे तपशील सिटीझन फायनान्शियल सायबर फ्रॉड्स रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टमवर तिकिटच्या स्वरूपात सबमिट करतील. 


पीडित व्यक्तीच्या बँकेकडून माहिती घेऊन, फसवणूक केलेले पैसे ज्या बँक/वॉलेटमध्ये गेले आहेत, त्यावर अवलंबून हे तिकीट संबंधित बँका, वॉलेट, व्यापारी इत्यादींना पाठवले जाईल. 


क्रमांकासह तक्रारीची पोचपावती पीडित व्यक्तीला एसएमएसच्या स्वरूपात पाठवली जाईल. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (https://cybercrime.gov.in/) 24 तासांच्या आत, पावती क्रमांक वापरून फसवणुकीचे संपूर्ण तपशील सबमिट करण्याचे निर्देश देखील यात असतील. 


संबंधित बँकेला रिपोर्टिंग पोर्टलच्या डॅशबोर्डवर तिकीट दिसेल. त्या अनुषंगाने ती बँक सिस्टममध्ये व्यवहाराचे तपशील तपासू शकेल. 


 फसवणूक केलेले पैसे अद्याप उपलब्ध असल्यास, बँक ते होल्डवर ठेवते, म्हणजे फसवणूक करणारा हे पैसे काढू शकत नाही. तथापि, फसवणूक केलेले पैसे दुसर्‍या बँकेत गेले असल्यास, तेच तिकीट पुढील बँकेकडे पाठवले जाते ज्यामध्ये पैसे गेले आहेत. 


फसवणूक करणार्‍यांच्या हाती पैसे जाण्यापासून वाचवण्यापर्यंत प्रक्रिया पुन्हा केली जाते. 


सध्याच्या डिजीटल युगात, सायबर चोरांना बळी पडणाऱ्या पीडित व्यक्तींसाठी ही हेल्पलाईन म्हणजे एक मोठे वरदान आहे. शक्यतो या हेल्पलाईनचा वापर गुन्हा घडल्या बरोबर लगेच केल्यास नुकसानी टाळता येऊ शकेल. आर्थिक सायबर गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्ती बँक अकाउंट बंद करण्यात, पोलिस स्टेशनच्या चकरा मारण्यात बहुमूल्य वेळ गमावतात. तोवर सायबर चोर त्यांचे पैसे घेऊन गायब झालेले असतात. 


काही कारणाने या हेल्पलाइन चा वापर करता आला नाही तरीही, आर्थिक गुन्हा घडल्यानंतर ज्या बँकेतून पैसे गेले आहेत, त्या बँकेच्या तीन कामाच्या दिवसांमध्ये सायबर पोलिसांकडे केलेल्या एफ आय आर ची सही शिक्क्या सह असलेली कॉपी जरूर सबमिट करावी आणि पोच घ्यावी. असे केल्यास बँकेला 90 दिवसांच्या आत चोरी गेलेले पैसे परत द्यावे लागतात. तसे रिझर्व बँकेचे सर्व बँकांना आदेश आहेत. बँकेने पैसे परत न केल्यास फसवणूक झालेली व्यक्ती ग्राहक न्यायालयात देखील दाद मागू शकते. 


सुरक्षित आणि सजग राहून टेक्नॉलॉजी चा वापर करा. 


आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत... 


©कविता दातार

सायबर सुरक्षा सल्लागार

Friday 12 November 2021

व्हाट्सएप ट्रॅप

 व्हाट्सएप ट्रॅप


रविवारची मस्त सकाळ. आजचा दिवस आरामात घालवायचा, असा विचार करून दामिनी कॉफीचा मग हातात घेऊन  न्यूज पेपर वाचत बसली होती. अचानक तिची नजर एका बातमीवर स्थिरावली.


"द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन ला अटक"

लक्षपूर्वक तिने ती बातमी वाचली. ज्या ग्रुप ॲडमीन ला पोलिसांनी काही व्हॉट्सऍप वापरकर्त्यांच्या तक्रारीवरून अटक केली होती, त्याचं नाव वाचून ती चक्रावली. आयुष अजय सिंघवी ???

आयुष, तिची मैत्रिण अश्विनीचा बावीस वर्षांचा तरुण मुलगा. दामिनी आयुषला लहानपणापासून अगदी जवळून ओळखत होती. अत्यंत साधा, सरळ, अभ्यासात हुशार असलेला आयुष असं काहीही करणार नाही, त्याला नक्कीच कोणीतरी यात अडकवलं असणार, याची तिला खात्री होती. दामिनीने अश्विनीला कॉल केला.

"हॅलो !  दामिनी, अगं, आयु ला काल काहीही कारण नसताना पोलीस घेऊन गेले..."
"अश्विनी ! मला एक फोन तर करायचास..."
"मला काही सुचतच नाहीये ग..."
" बरं...तू कोणा वकिलाचा सल्ला घेतलास का ?"
"हो...ॲड सचिन देशमुख त्याला जमीन मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. पण नेमकी आज सुट्टी आहे कोर्टाला... बिचारा माझा आयुष... त्याला पोलिसांनी मारलं वगैरे तर नसेल ना ग??"
एव्हढं बोलून अश्विनी रडायला लागली.
"शांत हो आशू... मी सचिनशी बोलते... आयुषला काहीही होणार नाही."

अश्विनी ची समजूत काढून दामिनीने फोन बंद केला आणि लगेच ॲड सचिन ला कॉल लावला.
"सचिन ! मला आयुषच्या केसचे डिटेल्स सांगशील का ?"
"हो...काही लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन, पोलिसांनी आयुषला माहिती तंत्रज्ञान कायद्या च्या 67 कलमाखाली अटक केली आहे.  तक्रारदारांनुसार आयुष ज्या व्हाट्सअप ग्रुपचा ऍडमिन आहे, त्या ग्रुप वरून द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट गेल्या तीन-चार दिवसांपासून व्हायरल झाली आहे."
"ओह !! आयुष चा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला असणार. माझ्यासोबत पोलीस स्टेशनला येतोस का ?त्याच्या फोनचं अँनालिसिस करायला मिळालं तर यातून काही तरी मार्ग निघेल."
"हो... लगेच नाही, पण दोन अडीच तासात पोलीस स्टेशनला ये... मी तिथे पोहोचतो..."
"ठीक आहे..."

दामिनी ने फोन बंद केला. दोन तासांत पोलीस स्टेशनला पोहोचायचं होतं. तिच्या हातात तासाभराचा वेळ होता. तेवढ्या वेळात तिने आयुषचे सोशल मीडिया हँडल्स अनालाइज करायचे ठरवले. लॅपटॉप उघडून तिने आयुष सिंघवी चे फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचे सोशल मीडिया अनालीटीक टूल द्वारे परीक्षण केले. या प्रकारच्या अँनालिसिस मुळे त्या व्यक्तीची मानसिक अवस्था बऱ्याच प्रमाणात जाणून घेता येते. जसं की ती व्यक्ती उदासीन, अस्वस्थ, रागीट आहे की संतुलित स्वभावाची आहे? त्या व्यक्तीच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक धारणा, मतं काय आहेत ?? वगैरे...

सोशल मीडिया अँनालिसिस वरून तरी आयुष एक संतुलित व्यक्तित्वाचा तरुण आहे, यावर शिक्कामोर्तब झालं.


दामिनी आणि  सचिनच्या विनंतीवरून पोलिसांनी आयुषच्या मोबाईल फोनची क्लोन्ड (cloned) कॉपी त्यांना तिथं बसून चेक करण्याची परवानगी दिली.

सायबर गुन्हा घडल्यानंतर, डिजिटल फॉरेन्सिक्स करताना ओरिजनल डिव्हाईस (या केसमध्ये मोबाईल फोन) जसाच्या तसा preserve करून त्याची क्लोन कॉपी तयार केली जाते. आणि संपूर्ण इन्वेस्टीगेशन त्या कॉपी वरच केलं जातं. ओरिजिनल डिव्हाईस मधील डेटा राखून ठेवला जाऊन त्याची एक हॅश की तयार केली जाते.  हॅश की म्हणजे एखाद्या मेमरीचे युनिक सिग्नेचर असतं. त्यामुळे कोर्टात ते डिव्हाईस पक्का पुरावा म्हणून सादर करता येतं.

दामिनी ने आयुष च्या मोबाईलची क्लोन कॉपी तपासायला सुरुवात केली. बरेच व्हाट्सअप ग्रुप्स दिसत होते. तिचे लक्ष एका व्हाट्सअप ग्रुप ने वेधून घेतले. "अमेझिंग वर्ल्ड" असे त्या ग्रुपचे नाव होते. त्या ग्रुपमधील बरेच नंबर्स पाकिस्तानी आणि बांगलादेशातील होते. त्या ग्रुपमध्ये बर्‍याच लिंक्स पोस्ट केलेल्या दिसत होत्या. पण आश्चर्य म्हणजे त्या लिंक्सवर आता कुठलेही कन्टेन्ट दिसत नव्हते.

सुदैवाने इतर कुठल्याही ग्रुप मध्ये कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट नव्हती. अमेझिंग वर्ल्ड या व्हाट्सअप ग्रुप मधील मेम्बर्स चे नंबर्स नोट करून घेऊन दामिनी ने सचिन सोबत आयुष ला भेटायचं ठरवलं.

"तुझ्या अमेझिंग वर्ल्ड या व्हाट्सअप ग्रुप मधल्या बऱ्याच मेम्बर्स चे नंबर पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत. तू या सगळ्यांना ओळखतोस का?"
तिने आयुषला विचारले.
"नाही, मी कोणालाच ओळखत नाही."
"मग तू त्यांना ग्रुप मध्ये का ॲड केलं ?"
"मी नाही कोणाला ऍड केलं. कोणीतरी मला या ग्रुप ची इन्व्हाईट लिंक पाठवली. नावावरून ग्रुप इंटरेस्टिंग वाटला. म्हणून त्या लिंक वरून मी ऍड झालो. त्यात झूलॉजी आणि जिओलॉजी विषयांवरील व्हिडीओज च्या लिंक्स पोस्ट व्हायच्या. त्या मी बऱ्याच वेळेस फॉरवर्ड केल्या आहेत."
"अरे, पण तू तर त्या ग्रुपचा ऍडमिन आहेस ना ?"
"त्या ग्रुपमध्ये मी एकटाच ॲडमिन नाहीये मावशी, बाकी अजून दोन-तीन ॲडमिन आहेत."
दामिनी ने त्या ग्रुप मधील विदेशी नंबर्स चं बऱ्याच वेळेस, व्यवस्थित अनालिसिस केल्यावर,  तिच्या लक्षात आलं, आयुष क्रॉस बॉर्डर सोशल इन्फ्ल्यून्सर ग्रुपमध्ये ट्रॅप झाला आहे.

आपल्या शेजारील देशातील काही समाजकंटक हे टेक्निक वापरून आपल्या देशातील काही लोकांमध्ये प्रभाव किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. यासाठी व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाचा वापर योजनापूर्वक केला जातो. सोशल मीडियावर आधी एक ग्रुप तयार करून त्यात काही भारतीयांना इन्व्हाईट लिंक द्वारे ऍड केलं जातं. सुरुवातीला मनोरंजक लिंक्स, व्हिडिओज आणि मेसेजेस द्वारे ऍड झालेल्या मेंबर्सना ग्रुपमध्ये राहण्यास भाग पाडलं जातं. ॲड झालेल्या मेंबर्सना पाठवलेल्या व्हिडिओ लिंक्स मध्ये ग्रुप ची इन्व्हाईट लिंक एम्बेड केली (लपवली) जाते. त्या मेंबरने ती लिंक फॉरवर्ड केल्यास इतर लोकही इन्व्हाईट लिंक द्वारे अशा ग्रुपमध्ये येतात. काहीजण quit होतात. काहीजण फारसा विचार न करता ग्रुपचे मेम्बर बनून राहतात.

हे समाजकंटक मालवेअर लिंक्स पाठवून मोबाईल देखील हॅक करतात. त्याद्वारे ब्लॅकमेल करतात. सुरुवातीला मनोरंजक पोस्ट ग्रुप वर येतात. नंतर त्यातच छुप्या लिंक्स एम्बेड करून धार्मिक तेढ वाढवणारा, आक्षेपार्ह कंटेंट शेअर केला जातो आणि ह्या ग्रुप द्वारे व्हायरल केला जातो.

या क्रॉस बॉर्डर ग्रुपच्या कोणा समाजकंटक मेंबरने, जाणीवपूर्वक, आक्षेपार्ह कंटेंट एम्बेड करून, कुठलीतरी, वरकरणी माहितीपूर्ण वाटणारी पोस्ट टाकली होती. पोस्ट टाकून हा समाजकंटक संगनमताने इतर मेंबर्स सोबत ग्रुप मधून बाहेर पडला होता. बाहेर पडणाऱ्यां मध्ये इतर ॲडमिन देखील होते. त्यामुळे आयुष एकटाच ग्रुपचा ऍडमिन म्हणून ट्रॅप झाला होता.

आयुष ने मनोरंजक व्हिडिओ समजून ती पोस्ट इतर ग्रुपमध्ये फॉरवर्ड केली होती. त्या पोस्टमध्ये लपलेली, धार्मिक तेढ निर्माण करणारी, आक्षेपार्ह कंटेंट ची लिंक एक्सेस झाल्याने, त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.

दामिनी ने या सगळ्या अनालिसिस चा एक रिपोर्ट तयार करुन, जरुरी ते स्क्रीनशॉट्स त्याला जोडले आणि तो रिपोर्ट ॲड सचिन देशमुख च्या हवाली केला. त्या अनालिसिस/ रिपोर्ट च्या आणि इतर पुराव्यांच्या आधारे आयुष ची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली. 

वरील सत्यघटनेवर आधारित कथेवरून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे जरुरी आहे. अनोळखी लिंक्स क्लिक करणे टाळावे.
अनोळखी ग्रुप मध्ये सामील होऊ नये.
कॉन्टॅक्ट लिस्ट मधील व्यक्तीं शिवाय कोणीही आपल्याला कुठल्याही ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही अशी सेटिंग करावी.
चुकून जरी अशा एखाद्या अनोळखी ग्रुप मध्ये ऍड झाल्यास लगेच बाहेर पडावे.
सजग आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत...

©कविता दातार