Wednesday, 6 August 2025

ऑनलाइन रमी


#onlinegaming #cybercrime #cybersecurity


#ऑनलाइन_रमी


सौरभ एक २५ वर्षांचा हुशार, कष्टाळू तरुण. पुण्यातील एका खाजगी कंपनीत तो नोकरी करत होता. त्याचे आई-वडील ग्रामीण भागात राहत होते, त्यामुळे सौरभवरच घरखर्चाची मोठी जबाबदारी होती. काम करून थोडीफार बचत करायची, घरच्यांना पैसे पाठवायचे, आणि स्वतःचं भविष्य घडवायचं…हा सौरभचा साधा सरळ हेतू होता.


मात्र, डिजिटल दुनियेतील चकाकी त्याच्यासाठी धोका बनून उभी राहिली. सोशल मिडियावर सतत येणाऱ्या आकर्षक जाहिरातींनी सौरभचं लक्ष वेधून घेतलं. “फक्त १०० रुपये लावा आणि १०,००० रुपये जिंका!” अशी मोठमोठी स्वप्ने दाखवणाऱ्या ऑनलाइन रमी अॅप्सच्या जाहिराती त्याच्या मोबाईल स्क्रीनवर सतत झळकू लागल्या.


सौरभने सुरुवातीला फक्त विरंगुळा म्हणून एक अॅप डाउनलोड केलं. “काय हरकत आहे? थोडा वेळ गेम खेळतो. थोडे पैसे जिंकले तर फायदाच आहे,” असं त्याला वाटलं. पहिल्या काही दिवसांत त्याला थोडा नफा झाला. १०० रुपये लावून ५००, १००० रुपये मिळाले. त्यामुळे त्याला वाटलं, “हे तर सहज आहे! एवढ्या थोड्या पैशांत मी बऱ्यापैकी कमावतो आहे.”


हळूहळू सौरभच्या मनात पैसे कमावण्याचा हव्यास वाढू लागला. ऑफिसमधून परत आल्यावर जेवणाआधी, झोपण्याआधी, सुट्टीच्या दिवशी, सगळा वेळ त्याचा रमीच्या गेममध्ये जाऊ लागला. सुरुवातीला थोडे जिंकलेले पैसे परत त्या अॅपवर लावले गेले. थोड्या दिवसांत सौरभचं खातं रिकामं झालं, पण त्याला वाटलं, “मी पुन्हा जिंकू शकतो. थोडं जास्त लावलं तर मोठा प्रॉफिट मिळेल.”


याच भ्रमात सौरभने स्वतःचं आर्थिक नुकसान सुरू ठेवलं. जेव्हा त्याच्या पगारातील सर्व पैसे संपले, तेव्हा त्याने मित्रांकडून उधार मागायला सुरुवात केली. जेव्हा मित्रांनी पैसे देणं बंद केलं, तेव्हा तो ‘इन्स्टंट लोन’ देणाऱ्या अॅप्सकडे वळला. अगदी काही मिनिटांत कर्ज मिळतं, पण ते कर्ज परतफेडीच्या अमानवी अटींसह येतं, हे त्याच्या लक्षात आलं नाही.


सौरभला सतत वाटत राहिलं की, तो लगेच पैसे जिंकून सगळं फेडून टाकेल. पण जुगाराचं गणित नेहमी नशिबावर चालतं. रमीच्या अॅप्सने त्याला लवकरच स्वतःच्या जाळ्यात ओढलं. सुरुवातीला जिंकवणारे अॅप्स नंतर त्याच्याकडून मोठे पैसे गमवून घेऊ लागले.


आर्थिक कोंडी इतकी वाढली की सौरभवर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज झालं. त्याला सतत फोनवरून कर्ज वसुलीचे धमकीचे कॉल येऊ लागले.  त्याचे फोटो एडिट करून सोशल मिडियावर टाकण्याची धमक्या त्याला येऊ लागल्या. या सगळ्याचा मानसिक ताण सौरभला सहन होत नव्हता.


घरच्यांसमोर तो काही बोलू शकत नव्हता. मित्रांनाही तो टाळू लागला. शेवटी या नैराश्यातून एक दिवस त्याने टोकाचा निर्णय घेतला… स्वतःचा जीव घेण्याचा. 


रमीच्या आहारी गेलेल्या सौरभची ही कहाणी फक्त त्याच्यावरच थांबली नाही. त्याच्यासारखे अनेक युवक आज या ऑनलाइन जुगारामुळे अडचणीत आहेत.


सौरभच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा उघड झालं की, तो ज्या अॅपवर रमी खेळत होता ते अॅप बेकायदेशीर होतं. ते परदेशातून चालवलं जात होतं. भारतात जुगारबंदी असतानाही अनेक वेबसाईट्स आणि अॅप्स विविध नावाखाली (जसे ‘स्किल गेम’, ‘फन गेम्स’) रमी, पोकर, सट्टा यासारखे जुगार चालवतात. सुरुवातीला छोटा नफा दाखवून लोकांना व्यसनात अडकवलं जातं आणि नंतर त्यांच्याकडून मोठे पैसे गमावले जातात.

या घटनेतून काय शिकावं?

 1. ऑनलाइन जुगार हा गुन्हा आहे — रमी, पोकर, सट्टा यासारख्या खेळांमध्ये फसवणूक मोठ्या प्रमाणावर होते.

 2. सुरुवातीला थोडा नफा दाखवून खेळणाऱ्यांना जाळ्यात ओढलं जातं — हे अॅप्स AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या साहाय्याने खेळाडूंची सवय व नफ्याची भूक लक्षात घेऊन त्यांना हरवतात.

 3. आर्थिक नुकसान तर होतंच, पण मानसिक आरोग्य देखील धोक्यात येतं — कर्जबाजारीपणा, नैराश्य, एकटेपणा यामुळे आत्महत्येचे विचार येतात.

 4. सायबर सुरक्षिततेचे नियम पाळा — कोणत्याही लिंकवर क्लिक करताना, अॅप डाउनलोड करताना काळजी घ्या. फसवणूक अॅप्स ओळखा.

 5. पैसे कमावण्यासाठी कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवा — मेहनतीने मिळवलेला पैसा हेच खरे संपत्तीचे मोल आहे.

 6. ‘इझी मनी’ जाहिराती फसव्या असतात — मोबाईलवर येणाऱ्या जिंकण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.

 7. संकटात असाल तर थेट सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार करा — फसवणुकीच्या अॅप्सविरोधात त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे.

काय करू नये?

 • पैशाच्या मोहात ऑनलाइन रमी, सट्टा, कॅसिनो अॅप्सवर खेळू नका.

 • ‘तुम्ही निवडले गेले आहात’ अशा संदेशांवर क्लिक करू नका.

 • कोणतीही वैयक्तिक माहिती (बँक डिटेल्स, KYC, OTP) अनोळखी लिंकवर देऊ नका.

 • अडचणीत असाल तर मित्र, कुटुंबीय किंवा सायबर तज्ज्ञांशी चर्चा करा.

 • गरज भासल्यास मानसिक आरोग्य सल्लागाराकडून मदत घ्या.

“नशीब आजमावण्यासाठी आयुष्याची बाजी लावू नका.”


सौरभसारख्या अनेक युवकांना वाचवण्यासाठी सायबर जागरूकता वाढवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.


सतर्क रहा, सुरक्षित रहा.


©कविता दातार

Thursday, 20 March 2025

डिजिटल अरेस्ट

#CyberCrime #CyberSecurity #Digital_Arrest


डिजिटल अरेस्ट 


एका सकाळी मुंबईतील दादर या उपनगरात राहणाऱ्या ८६ वर्षीय जोशीबाईंचा मोबाईल फोन वाजला. 

"हॅलो?" त्यांचा आवाज वृद्धत्वामुळे आणि अस्वस्थतेमुळे कापत होता.

"शुभ सकाळ, मॅडम," पलीकडून एक स्पष्ट आवाज आला. "मी संदीप राव, सीबीआयमधून बोलतोय." त्याचे शब्द जोशीबाईंच्या कानावर एखाद्या धक्क्यासारखे आदळले. राव यांनी त्यांना सांगितले की त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले बँक खाते मनी लाँड्रिंगमध्ये सामील आहे. भीतीने जोशीबाईंच्या पोटात गोळा आला.

राव यांच्या धमक्या वाढत गेल्या, त्यांनी जोशीबाईंच्या मुलांना अटक करण्याची आणि त्यांची खाती गोठवण्याची धमकी दिली. त्यानंतर रावने "डिजिटल अरेस्ट" ही संकल्पना मांडली - एक अशी संकल्पना ज्यामुळे जोशीबाईंना त्यांच्याच घरात सतत देखरेखीखाली ठेवण्यात आले. बनावट सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवल्या गेल्या, ज्यामुळे कायदेशीर संकटाचा आभास निर्माण झाला. सततच्या फोन कॉल्सने त्यांचे दिवस सरत होते, फोन कॉल्सही दोन ते तीन तास चालत, ज्यात राव आणि राजीव रंजन नावाची दोन माणसे बोलत असत. राव आणि राजीव रंजन यांनी जोशीबाईंच्या व्यवसायातील आणि गुंतवणुकीबद्दलची सगळी माहिती काढली. त्याच वेळी त्यांना कायद्याची, अटकेची भीती घालून घरात जखडून ठेवले. 

एकेकाळी उत्साही असलेल्या कुटुंबातील प्रमुख सदस्य आता स्वतःच्या घरातच कैदी बनल्या होत्या. त्यांचा एकमेव गुन्हा काय तर अज्ञान आणि असुरक्षितता...

जसजसे आठवडे सरले, तसतसे जोशीबाईंच्या वागण्यात बदल व्हायला लागला. त्या स्वतःच्या खोलीत बंद राहू लागल्या, त्यांचं बोलणं कमी झालं. त्या दबक्या आणि चिंताग्रस्त आवाजात कोणाशी तरी सतत बोलत. त्यांच्याकडे घरकामाला असणाऱ्या मंगलाला हा बदल जाणवला. ज्या बाई गोष्टी आणि हास्य विनोद शेअर करायच्या, त्या आता फक्त जेवणासाठी बाहेर येत होत्या आणि बहुतेक वेळा न दिसणाऱ्या त्रास देणाऱ्यांवर ओरडत होत्या. 

चिंतेत असलेल्या मंगलाने जोशीबाईंची मुलगी प्रियाला याबाबत माहिती दिली.

प्रियाने तातडीने हे घोटाळ्याचे लक्षण ओळखले. तिने ४ मार्च रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आणि तपासाला सुरुवात झाली. 

सायबर क्राईम विभागाने चोरी केलेले पैसे विविध खात्यांमध्ये शोधले, आणि त्यामुळे ते मालाडमधील २० वर्षीय शयन शेख आणि मीरा रोडमधील रझीक बट यांच्यापर्यंत पोहोचले.

पोलिसांच्या तपासात फसवणुकीचे एक भयानक जाळे उघड झाले, ज्यामध्ये चोरीचे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये वळवले जात होते. 

सायबर गुन्हेगारांना अटक झाल्याने थोडा दिलासा मिळाला असला तरी, जोशीबाईंच्या  मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. वीस कोटी रुपये हे केवळ त्यांच्या आयुष्याची जमापुंजी नव्हती, तर त्यांची सुरक्षितता होती, जी आता डिजिटल जगात लपलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी कायमची हिरावून घेतली होती. 


टीप- डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार आपल्या देशात अस्तित्वात नाही. असे कॉल आल्यास पूर्णतः दुर्लक्ष करावे. 

सतर्क आणि सुरक्षित राहून तंत्रज्ञानाचा वापर करावा.

(मुंबईतील सत्यघटनेवर आधारित)


कविता दातार