Thursday, 20 March 2025

डिजिटल अरेस्ट

#CyberCrime #CyberSecurity #Digital_Arrest


डिजिटल अरेस्ट 


एका सकाळी मुंबईतील दादर या उपनगरात राहणाऱ्या ८६ वर्षीय जोशीबाईंचा मोबाईल फोन वाजला. 

"हॅलो?" त्यांचा आवाज वृद्धत्वामुळे आणि अस्वस्थतेमुळे कापत होता.

"शुभ सकाळ, मॅडम," पलीकडून एक स्पष्ट आवाज आला. "मी संदीप राव, सीबीआयमधून बोलतोय." त्याचे शब्द जोशीबाईंच्या कानावर एखाद्या धक्क्यासारखे आदळले. राव यांनी त्यांना सांगितले की त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले बँक खाते मनी लाँड्रिंगमध्ये सामील आहे. भीतीने जोशीबाईंच्या पोटात गोळा आला.

राव यांच्या धमक्या वाढत गेल्या, त्यांनी जोशीबाईंच्या मुलांना अटक करण्याची आणि त्यांची खाती गोठवण्याची धमकी दिली. त्यानंतर रावने "डिजिटल अरेस्ट" ही संकल्पना मांडली - एक अशी संकल्पना ज्यामुळे जोशीबाईंना त्यांच्याच घरात सतत देखरेखीखाली ठेवण्यात आले. बनावट सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवल्या गेल्या, ज्यामुळे कायदेशीर संकटाचा आभास निर्माण झाला. सततच्या फोन कॉल्सने त्यांचे दिवस सरत होते, फोन कॉल्सही दोन ते तीन तास चालत, ज्यात राव आणि राजीव रंजन नावाची दोन माणसे बोलत असत. राव आणि राजीव रंजन यांनी जोशीबाईंच्या व्यवसायातील आणि गुंतवणुकीबद्दलची सगळी माहिती काढली. त्याच वेळी त्यांना कायद्याची, अटकेची भीती घालून घरात जखडून ठेवले. 

एकेकाळी उत्साही असलेल्या कुटुंबातील प्रमुख सदस्य आता स्वतःच्या घरातच कैदी बनल्या होत्या. त्यांचा एकमेव गुन्हा काय तर अज्ञान आणि असुरक्षितता...

जसजसे आठवडे सरले, तसतसे जोशीबाईंच्या वागण्यात बदल व्हायला लागला. त्या स्वतःच्या खोलीत बंद राहू लागल्या, त्यांचं बोलणं कमी झालं. त्या दबक्या आणि चिंताग्रस्त आवाजात कोणाशी तरी सतत बोलत. त्यांच्याकडे घरकामाला असणाऱ्या मंगलाला हा बदल जाणवला. ज्या बाई गोष्टी आणि हास्य विनोद शेअर करायच्या, त्या आता फक्त जेवणासाठी बाहेर येत होत्या आणि बहुतेक वेळा न दिसणाऱ्या त्रास देणाऱ्यांवर ओरडत होत्या. 

चिंतेत असलेल्या मंगलाने जोशीबाईंची मुलगी प्रियाला याबाबत माहिती दिली.

प्रियाने तातडीने हे घोटाळ्याचे लक्षण ओळखले. तिने ४ मार्च रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आणि तपासाला सुरुवात झाली. 

सायबर क्राईम विभागाने चोरी केलेले पैसे विविध खात्यांमध्ये शोधले, आणि त्यामुळे ते मालाडमधील २० वर्षीय शयन शेख आणि मीरा रोडमधील रझीक बट यांच्यापर्यंत पोहोचले.

पोलिसांच्या तपासात फसवणुकीचे एक भयानक जाळे उघड झाले, ज्यामध्ये चोरीचे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये वळवले जात होते. 

सायबर गुन्हेगारांना अटक झाल्याने थोडा दिलासा मिळाला असला तरी, जोशीबाईंच्या  मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. वीस कोटी रुपये हे केवळ त्यांच्या आयुष्याची जमापुंजी नव्हती, तर त्यांची सुरक्षितता होती, जी आता डिजिटल जगात लपलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी कायमची हिरावून घेतली होती. 


टीप- डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार आपल्या देशात अस्तित्वात नाही. असे कॉल आल्यास पूर्णतः दुर्लक्ष करावे. 

सतर्क आणि सुरक्षित राहून तंत्रज्ञानाचा वापर करावा.

(मुंबईतील सत्यघटनेवर आधारित)


कविता दातार