Thursday, 28 June 2018

स्मार्टफोनचा स्मार्ट वापर

स्मार्टफोनचा स्मार्ट वापर

स्मार्टफोन. . . आपल्यापैकी बहुतेक जणांच्या आयुष्यात महत्त्वाचा असणारा. आपण आपल्या स्मार्टफोनची बाह्यतः    खूप काळजी घेतो. बॅककव्हर, स्क्रीनगार्ड लावून त्याला सुरक्षित ठेवतो.  हे गरजेचेही आहे. पण या बाह्य काळजीबरोबरच आपल्या स्मार्टफोनची अंतर्गत काळजी घेणे ही खूप जरुरी आहे. कारण आपला वैयक्तिक आणि महत्त्वाचा डाटा आपल्या स्मार्टफोनमध्ये असतो. जसे सोशल नेटवर्किंगवरील मेसेजेस, मोबाईल बँकिंगचे आणि ईमेल अकाऊंट्सचे पासवर्डस् इत्यादी. . .

स्मार्टफोनची सुरक्षितता

स्मार्टफोन इंटरनेटला जोडलेला असल्याने त्यावर व्हायरस, ट्रोजन, हॅकर्सचा वगैरे हल्ला होण्याची शक्यता असते. स्मार्टफोनवरील डाटा चोरीलाही जाऊ शकतो. या सगळ्यापासून स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठीचे काही उपाय.

- स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम / सॉफ्टवेअर सूचना मिळाल्यावर लगेच अपडेट करावे.

- स्मार्टफोनवरील ॲप्सचे अपडेट्स उपलब्ध झाल्यावर शक्यतो लगेच डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.

- आपल्या वापरासाठी लागणारे ॲप्स स्मार्टफोनमध्ये मुळातच उपलब्ध असल्यास त्याचाच वापर करावा. त्यासाठीच्या इतर ॲप्स (थर्ड पार्टी ॲप्स) चा वापर शक्यतो  टाळावा. उदाहरणा दाखल आरोग्याशी संबंधित ॲप वापरायचे असल्यास सॅमसंग फोनमध्ये सॅमसंग हेल्थ हे ॲप उपलब्ध आहे.

- आवश्यक असलेलेच थर्ड पार्टी ॲप्स स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे. जसे मोबाईल बँकिंग, युपीआय, शेअर बाजार, म्युच्युअल फंड , रेल्वे/बस रीझर्वेशन संबंधित ॲप्स.

- कुठलेही थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर त्याचे गुगलवर रिव्ह्यूज तपासावे. कुठल्याही ॲपला आवश्यक तेवढ्याच एक्सेस परमिशन्स द्याव्यात. जसे मोबाईल बॅंकिंग ॲपला एसएमएस, स्टोरेज आणि लोकेशन एवढ्याच परमिशन्स आवश्यक आहेत.

- कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्टोरेजची परमिशन देताना विशेष सावधगिरी बाळगावी. या परमिशन्स वापरून काही ॲप्स नकळत तुमचे फोटो काढून त्यांच्या साइटवर अपलोड करू शकतात. तुमचे संवाद रेकॉर्ड करू शकतात तसेच स्टोरेजमधील फोटो, व्हिडिओ आणि इतर डाटाची चोरी करू शकतात.

- दिलेल्या परमिशन्स सेटिंग्जमध्ये जाऊन काढूनही घेता येतात.

- स्मार्टफोनवर क्विकहील, नोर्टन किंवा एव्हीजी यासारखे चांगले अँटीव्हायरस ॲप इन्स्टॉल करावे आणि ते कायम अपडेटेड ठेवावे. सध्या अँटीव्हायरस असल्याचा दावा करणारे बरेच मॅलीशियस ॲप्स इंटरनेट वर उपलब्ध आहेत. असे ॲप्स वापरल्यास व्हायरस आणि ट्रोजन्स ना प्रतिबंध होण्याऐवजी तुमच्या स्मार्टफोनमध्ये त्यांचा शिरकाव होतो आणि स्मार्टफोनचा डाटा लीक होऊ शकतो.

- काही टेक्निकल कारण नसताना आणि इंटरनेटचा खूप वापर नसताना देखील मोबाईल डेटा चा जास्त वापर होत असेल आणि / किंवा बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असेल तर हॅकिंग ची संभावना असू शकते. अशा वेळेस  जाणकाराकडून मोबाईल तपासून घ्यावा. फॅक्टरी रीसेट करून देखील हॅक झालेला मोबाईल दुरुस्त करता येतो.

डाटा, स्टोरेज आणि मेमरी यांची देखभाल

- अँटी व्हायरस ॲपचा वापर करून दोन तीन दिवसांतून एकदा मेमरी आणि जंक फाइल्स साफ करावे आणि फोन स्कॅन करावा.

- वापरात असलेले ॲप्स तेवढे चालू ठेवून बाकीचे मिनिमाइझ न ठेवता बंद ठेवावे.

- स्मार्टफोनवरील सर्व डाटा, काँटॅक्ट्स, ॲप्स आणि सेटिंग्सचा बॅकअप ठेवावा. स्मार्टफोन ज्या ब्रॅण्डचा आहे त्याच्या क्लाऊडवर (web space) ऑटो बॅकअप करण्यासाठीचे सेटिंग करावे. दुहेरी सुरक्षा म्हणून काँटॅक्ट्स मेमरी कार्ड किंवा इमेलवर एक्सपोर्ट (सेव) करून ठेवावे.

- जमा झालेले फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस वेळच्यावेळी काढून टाकावे.

- संग्रहणीय असलेले फोटो आणि व्हिडिओ मेमरी कार्डमध्ये ठेवावे.

- रात्री झोपताना स्मार्टफोनवरील इंटरनेट बंद ठेवावे.

- आठवड्यातून एकदा तरी स्मार्टफोन पूर्णपणे बंद करून दहा ते तीस सेकंदाने परत सुरू करावा.

- पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न (लक्षात राहील असे) वापरून मोबाईल नेहमी लॉक ठेवावा. मात्र लॉक स्क्रीन वर आपल्या जवळच्या व्यक्तिची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिसत राहिल, अशी सेटिंग करावी. आपत्कालीन परिस्थितीत याचा उपयोग होतो.

- मोबाईल डिव्हाईस बदलल्यास, जुन्या डिवाइस वरचे सेटिंग्स, ॲप्स, म्युझिक, फोटो, कॉन्टॅक्ट वगैरे सर्व माहिती नव्या डिवाइस मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी स्मार्ट स्विच सारखे ॲप्स वापरू शकता

याप्रमाणे स्मार्टफोनची काळजी घेतल्यास आपला वैयक्तिक डाटा सुरक्षित राहतो. स्मार्टफोन हँग होणे, अचानक रीसेट होणे हे प्रकार टळतात. आणि बरेच दिवसांपर्यंत स्मार्टफोन सुस्थितीत राहतो.

©कविता दातार

Wednesday, 6 June 2018

कॉमेंट

कॉमेंट

सुमारे पाचेक वर्षांपूर्वीची गोष्ट. एका मोठ्या, लोकप्रिय नेत्याचे निधन झाल्याने अवघी मुम्बई शोकसागरात बुडाली होती त्यावेळची. . .
*****
फाटकाची कडी वाजल्याचा आवाज आला तसे प्राजक्ताने हातातले पुस्तक बाजूला ठेवून  बाहेर धाव घेतली. तिच्या अपेक्षेप्रमाणे पोस्टमन तिच्या नावाचे टपाल घेउन आला होता.  तिने ते पाकिट हातात घेउन  उघडले आणि अधीरतेने
वाचू लागली. मुंबईत दादरमधील बालमोहन विद्या मंदिर या शाळेत संगणक विभाग प्रमुख पदासाठी तिने अर्ज केला होता.  त्याचा तो इंटरव्ह्यू कॉल होता.
लातूरमधील १९९३ च्या भीषण भूकंपात आई वडिलांना गमावलेल्या पाच वर्षांच्या प्राजक्ताला तिचे काका कायमसाठी मालवण ला घेउन आले. काका-काकूला मूलबाळ नसल्याने प्राजक्ता त्यांची खूप लाडकी होती. प्राजक्ताचे मिलिंद काका आणि मालती काकू दोघेही चिपळूणमधील प्रसिद्ध डॉक्टर होते. हुशार आणि मेहनती प्राजक्ताने चिपळूणमधील एका कॉलेजमधून एमसीए पूर्ण केले होते. वेळ जाण्यासाठी तेथील एका संगणक संस्थेत तिने शिक्षिकेची नोकरी धरली होती. पण उत्तम प्रोग्रॅमिंग येत असलेल्या प्राजक्ताचे मन त्या नोकरीत रमत नव्हते. तिला मोठ्या शहरात जाऊन सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम करायचे होते. म्हणून काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात 'पाहिजेत' या शीर्षकाखाली आलेल्या या नोकरीची जाहिरात पाहून तिने अर्ज केला होता. त्याचा तो इंटरव्ह्यू कॉल होता. येत्या सोमवारीच तिचा इंटरव्ह्यू होता.  प्राजक्ताने मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली.
रविवारी सकाळी अकरा च्या बसने ती मुंबईला निघाली.
तिच्या काकूची मैत्रीण दादर बस स्टॅंडवर तिला घ्यायला येणार होती. पावणेसहाला बस मुंबईत आली. पण हे काय . . . जागोजागी रस्ते माणसांनी फुलले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते वाहनांसाठी बंद केले होते. त्या महान नेत्याची अंत्ययात्रा त्या मार्गाने जाणार असल्याने हा बंदोबस्त केला होता.  दादर बस स्टँड तर सोडाच, बस थोडी देखील पुढे जाऊ शकत नव्हती.  पोलिसांनी बस तेथेच थांबवली. बाकीची वाहने देखील तिथे थांबून होती. चौकशी केल्यावर प्राजक्ताला कळले की ही गर्दी त्या नेत्याचे अंत्यसंस्कार झाल्याशिवाय म्हणजे जवळजवळ रात्री पर्यंत अोसरणार नव्हती. काय करावे तिला कळत नव्हते. फार वेळ तिथे असे थांबता येणार नव्हते.  आपल्या मोबाईलवरून काकूच्या मैत्रिणीला तिने फोन लावला. पण त्यांनीही तिला तिथे घ्यायला येण्यास असमर्थता दाखवली. उलट गर्दीत किंवा चेंगराचेंगरीत अडकू नये म्हणून त्यांनी तिला मालवणला परत जाण्याचा सल्ला दिला. खूप विचार करून शेवटी इतर काही प्रवाशांबरोबर तिने परत मालवणला जायचे ठरवले. तिचा खूप विरस झाला. एवढी चांगली नोकरी हातची गेली होती. निराशेने ती परत मालवण ला येण्यासाठी टॅक्सीत बसली. घरी परत यायला तिला खूप रात्र झाली. सगळी हकीकत थोडक्यात काका-काकू ला सांगून, थकून ती झोपायला गेली.
सकाळी तिला बिलकुल उठवले जात नव्हते. खूप थकल्यासारखे वाटत होते. कसेबसे उठून, आवरून तिने लॅपटॉप सुरू केला आणि फेसबुकवर लॉगइन केले.

इतरांच्या पोस्टस् वाचत असताना तिचे लक्ष कुणीतरी शेअर केलेल्या त्या नेत्याच्या अंतिम यात्रेच्या फोटोकडे गेले. त्या फोटोवरील कमेंट्स ती वाचू लागली. बऱ्याच लोकांनी त्या नेत्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. तिला कालचा प्रसंग आठवला आणि या गर्दीमुळे आपण इंटरव्ह्यूला मुकलो हे आठवून तिला विषाद वाटला. त्या तिरीमिरीतच तिने कमेंट टाकले, "एका माणसाचा मृत्यू झाल्यास, मग तो कितीही मोठा असला तरी, त्याच्या अंत्ययात्रेसाठी रस्त्यावर लोकांनी एवढी गर्दी करून, रस्ते बंद करून, सामान्य जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य आहे ?? मी या गोष्टीचा निषेध करते." तिची कमेंट पोस्ट झाल्याबरोबर तिला भलंबुरं ठरवणाऱ्या, धमकी आणि शिवीगाळ करणाऱ्या कमेंट एकामागोमाग एक पोस्ट होऊ लागल्या. वैतागून तीने लॅपटॉप बंद केला आणि पुस्तक वाचायला घेतले.
प्राजक्ताच्या काकांचे हॉस्पिटल त्यांच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होते आणि वरच्या मजल्यावर त्यांचा रहिवास होता. दुपारचे जेवण झाल्यावर प्राजक्ता आणि तिची काकू बोलत बसल्या असताना अचानक बर्‍याच लोकांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. काय झाले पाहायला दोघी गॅलरीत आल्या. तीन-चारशे लोकांचा जमाव त्यांच्या हॉस्पिटलच्या दिशेने येत होता. त्यांच्या हातात हॉकीस्टीकस्, क्रिकेट बॅटस्, काठ्या वगैरे होत्या. काही लोकांच्या हातात मोठे दगड होते. ती लोक जोर जोरात ओरडत, शिवीगाळ करत होते. त्यातील काही लोकांनी पुढे होऊन हॉस्पिटलचे प्रवेशदार गाठले होते आणि आत येऊन दिसेल ते सामान मोडतोड करून बाहेर फेकत होते. खिडक्यांच्या काचा दगड मारून फोडत होते. तिचे काका गडबड ऐकून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पायर्‍या उतरू लागले.
प्राजक्ता आणि तिची काकू सुद्धा  धावत जिन्याकडे आल्या. पण  काकांनी त्यांना हाताने तिथेच थांबवले.  जमाव खूप संतापला होता. हिंसक, आक्रमक  झाला होता.  प्रतिकार करणाऱ्या हॉस्पिटलच्या स्टाफपैकी एका दोघांना डोक्यात हॉकीस्टिक मारून त्यांच्यातील काही लोकांनी जखमी केले होते. काय होते आहे हे प्राजक्ताला आणि तिच्या काका काकूंना कळत नव्हते. ते हतबल होऊन जीन्यात उभे राहून सगळा गोंधळ पाहत होते. मिलिंद काका पुढे झाले आणि त्यांनी हिंसक जमावाला सामोरे जात, त्यांच्या अशा तर्‍हेने चाल करून येण्याचे कारण विचारले. "कारण काय विचारता डॉक्टर ? या तुमच्या पोरीने आमच्या देवासमान नेत्याला फेसबुकवर शिव्या दिल्या विचारा तीला." त्यांचे बोलणे ऐकून प्राजक्ताच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. रागात टाकलेल्या कमेंट चा तिला पस्तावा झाला. पण आता काही उपयोग नव्हता. जमाव काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. हॉस्पिटलचे खूप नुकसान झाले होते. स्टाफमधील काही जण आणि दोन तीन पेशंट सुद्धा जखमी झाले होते. जमावातील दोघे तिघे जण काका काकू आणि प्राजक्ताच्या दिशेने हॉकीस्टिक उगारत धावून आले. त्यांच्यापैकी एका वयस्कर माणसाने त्यांना आवरले आणि तो मिलिंद काकांना म्हणाला, "डॉक्टर तुम्ही देव माणूस, आमची इतकी वर्षं इमाने इतबारे सेवा केली. पण तुमच्या पुतणी ने सगळ्यावर पाणी फिरवले. तुम्ही लवकरात लवकर हे गाव सोडून निघून जा, नाहीतर ही लोक तुम्हाला जिवंत सोडणार नाही."
त्यादिवसा नंतर प्राजक्ता आणि काका काकूंना घराबाहेर पडणे कठीण झाले. रात्री बेरात्री त्यांना धमकीचे फोन येऊ लागले. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली होती. असं वाटत होतं की, फेसबुकवरच्या पोस्टच्या रागाच्या आड काही हितशत्रू आपला दावा साधून प्राजक्ता च्या कुटुंबियांना गाव सोडायला भाग पाडत होते. शेवटी या प्रकाराला कंटाळून काका-काकू आणि प्राजक्ता ने मालवण सोडून बंगलोर ला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. बंगलोर ला मालती काकूच्या भावाचे मोठे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल होते, तिथे दोघांनी रुजू होण्याचे ठरले. इतक्या वर्षांचे मालवण मधले वास्तव्य आणि जम बसलेली प्रॅक्टीस सोडून जाणे दोघांना फार जीवावर आले होते. पण करणार काय??
*****
प्राजक्ता आणि तिचे काका काकू आज बंगलोरला निघाले होते. मालवण सोडून कायमसाठी. फेसबुकवर रागात पोस्ट केलेल्या एका कमेंटने त्या सर्वांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते.
*****




Wednesday, 16 May 2018

मायाजालात गुंतलेली तरुणाई

मायाजालात गुंतलेली तरुणाई

चेतन एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी. वसतिगृहात राहून विद्यापीठात एमसीए करणारा. चेतनचा चौथ्या सेमिस्टरचा निकाल मात्र त्याच्या पालकांसाठी अगदीच अनपेक्षित आणि धक्कादायक होता. चक्क चार विषयात तो नापास झाला होता. त्याच्या नापास होण्याचे कारण दिवस अन रात्र सोशल नेटवर्किंग, चॅटिंग आणि पोर्न साइटस्.
दहावीनंतरच्या सुट्टीत सोनिया लोणारला समर कॅम्प साठी गेली होती. तिथे तिची समीरशी ओळख झाली. कँप संपल्यानंतरही फेसबुकवरून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांचा दिवसातील बराच वेळ एकमेकांशी चॅटिंग करण्यात जायचा. त्यामुळे सोनिया तिच्या कुटुंबीयांशी, मित्रमैत्रिणींशी दुरावली. समीर सोबत तिने स्वतःचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. काही दिवसांनंतर तिला या चॅटिंगचा कंटाळा आला. पण समीर तिचे व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला चॅटिंग करण्यास भाग पाडू लागला. या सर्व प्रकारामुळे सोनियाला डिप्रेशन आले. सध्या ती मानसोपचार घेत आहे.
अकरावीतला जतीन ऑनलाइन गेम्सच्या आहारी गेल्यामुळे सैरभैर आणि चिडचिडा झाला आहे.
निशाचे कॅम्पस सिलेक्शन होऊन तिला एका चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी लागली. पण सारखे व्हॉट्सअॅप आणि मेल चेक करत राहण्याच्या सवयीमुळे तिला वारंवार वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या अशी बरीच उदाहरणे आपल्या आसपास दिसतील. आपली तरुण मुलं चॅटिंग, गेमिंग, सोशल नेटवर्किंग आणि पोर्न साइट्सच्या मायाजालात अडकून इंटरनेट व्यसनाधीन तर झाली नाहीत ना? याची खात्री पालकांनी करून घेणे अत्यावश्यक  आहे.

इंटरनेटचे व्यसन कसे ओळखाल ?

-बराचसा वेळ व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर ऑनलाईन असणे.
-रात्रीची झोप पूर्ण न होणे, त्यामुळे सकाळी लवकर  जाग न येणे.
-काही कारणाने इंटरनेट बंद असल्यास अस्वस्थ होणे, चिडचिड करणे.
-सारखे मोबाइल चेक करणे.
-बंद खोलीत एकटे बसणे.
-कुटुंबीयांशी संवाद कमी होणे.
-मित्र मैत्रिणींपासून दूर राहणे.
-अभ्यासात मागे पडणे.
-आधी असलेल्या छंद, आवडीमध्ये स्वारस्य न उरणे.
वरील लक्षणांपैकी पाच ते सहा लक्षणे जरी पालकांना आपल्या मुलांमध्ये आढळली तरी त्यांनी वेळीच सावध व्हावे.

पालकांची भूमिका

इंटरनेटचे हे व्यसन लागल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ते लागू नाही यासाठी पालकांनी काही गोष्टींची दक्षता घेणे जरूरी आहे.
-मुलांशी सुसंवाद साधा. त्यांच्याकडे लक्ष द्या. घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. त्यांची दिनचर्या तुम्हाला माहिती असायला हवी.
-मुलांना इंटरनेट, चॅटिंग, सोशल नेटवर्किंग वगैरे बाबतचे परिणाम चांगल्या शब्दात समजावून द्या. तुम्ही स्वतः मोबाइल फोन आणि सोशल नेटवर्किंगचा मर्यादित वापर करा आणि मुलांसमोर एक चांगले उदाहरण ठेवा. त्याचबरोबर त्यांच्या ऑनलाईन अॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवा.
-कॉलेजला गेल्याशिवाय त्यांना स्मार्टफोन देऊ नका. स्मार्टफोन दिल्यावरही मर्यादित डेटा प्लॅन वापरायला द्या.
-त्यांना स्वयंशिस्त बाळगायला शिकवा. मोबाइल फोन आणि इंटरनेटवर घालवायची वेळ मर्यादा सुनिश्चित करा.
-घरात जर वायफाय नेटवर्क असेल, तर मुलांचे मोबाइल फोन्स आणि लॅपटॉप्स त्यांच्या अभ्यासाच्या वेळेत, जसे रात्री आठनंतर वायफाय राउटरला कनेक्ट होऊ शकणार नाहीत, असे सेटिंग तुम्ही तुमच्या सर्व्हिस इंजिनीअरला सांगून करून घेऊ शकता किंवा त्या वेळेत वायफाय राऊटर बंद ठेवा.
-त्यांना एखादा छंद बाळगायला शिकवा. घरातील कामात त्यांना सहभागी करून घ्या.
-त्यांच्या शिक्षकांना भेटून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घ्या.
-मुलांच्या वागणुकीत बदल आढळल्यास त्यांना विश्वासात घेऊन त्याचे कारण जाणून घ्या.
एवढे करूनही दुर्दैवाने तुमचे मूल इंटरनेटचा अति वापर करते आहे असे जाणवल्यास तुम्ही समुपदेशकाची मदत घेऊ शकता.
बऱ्याचदा मुलांना असाइनमेंट, प्रोजेक्ट, नोट्स वगैरेसाठी इंटरनेटवरून माहिती हवी असते. त्यासाठी मुलं इंटरनेट वापरत असतील तर तसे त्यांना वापरू द्यावे. मात्र ते नेमके कशासाठी इंटरनेट वापरत आहेत हे जाणून घ्यावे.

मुलांची भूमिका

-सर्वप्रथम आपले शैक्षणिक ध्येय निश्चित करा आणि दिवसातील जास्तीत जास्त वेळ ते साध्य करण्यासाठी द्या.
-आपला दिनक्रम ठरवून घ्या. त्यात काही वेळ मर्यादित प्रमाणात चॅटिंग आणि सोशल नेटवर्किंग केल्यास हरकत नाही.
-स्वयंशिस्त बाळगा. अभ्यासाच्या वेळी मोबाइल इंटरनेट बंद ठेवा.
-स्वस्त, अमर्यादित डेटा प्लॅन असला तरी तो विनाकारण वापरू नका. त्यामुळे तुमचा वेळ खर्च होईल. त्यापेक्षा तुमचे काम आणि अभ्यास महत्त्वाचे आहेत.
-तुमच्या अभ्यास आणि कामा संबंधित माहिती इंटरनेटवरून हवी असल्यास नेमके काय हवे आहे ते लिहून ठेवा आणि ते गुगल सर्च पॅटर्न वापरून सर्च करा. मिळालेली माहिती कॉपी पेस्ट करून ऑफलाइन ठेवा. म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही. माहिती घेताना मध्ये येणाऱ्या नको असलेल्या लिंक्सवर जाऊ नका.

-ऑनलाईन गेम्सचे व्यसन फार लवकर लागते यासाठी अश्या गेम्सपासून कायम दूर राहा.
-स्वतःचे छंद, आवडी जोपासा.
-मित्र मैत्रिणींशी चॅटिंग करण्याऐवजी त्यांच्याशी फोनवर बोला.
-इंटरनेटचा विनाकारण अतिवापर होतो आहे, असे लक्षात आल्यास त्याच्या आहारी न जाता कुटुंबीयांना, मित्रमैत्रिणींना विश्वासात घेऊन यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची मदत घ्या.

एका अहवालानुसार आज भारतात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ४६ करोड आहे. हे प्रमाण भारतातील लोकसंख्येच्या ३५ टक्के एवढे आहे. यातील ७४ टक्के प्रमाण हे तेरा ते तीस वयोगटातील तरुण वापरकर्त्यांचे आहे. यापैकी २५ टक्के तरुण इंटरनेटचा अतिवापर करतात आणि २ टक्के तरुण या मायाजालात पूर्णपणे अडकून इंटरनेट व्यसनाधीन झालेले आहेत.
अजून तरी पाश्चात्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पण देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरुणांना इतर व्यसनांप्रमाणे या मायाजालाच्या व्यसनापासून सुद्धा दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरांतून प्रयत्न अपेक्षित आहेत.



©कविता दातार
सायबर सेक्युरीटी कंसल्टंट

Monday, 9 April 2018

फेसबुक फोटो शेअरिंग


फेसबुक फोटो शेअरिंग

काल एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. आवाजात नाराजी झळकत होती. तिने सांगितले, फेसबुकवर तिने अपलोड केलेला तिचा फोटो एका अनोळखी व्यक्तीने शेअर केला आहे. तिने त्याला तो फोटो काढून टाकण्यासाठी विनंतीवजा मेसेज केला, पण त्याने उत्तर दिले नाही आणि फोटोही काढला नाही. फेसबुकला रिपोर्ट करून देखील काहीही उपयोग झाला नाही. शेवटी तिने पोस्ट केलेला फोटो  डिलीट केला. मी, त्या व्यक्तीने शेअर केलेली पोस्ट चे डिटेल्स मला पाठव असे तिला सांगितले. त्याप्रमाणे तिने पाठवलेल्या  डिटेल्सवरून मी त्याचे फेसबुक प्रोफाइल पाहिले. तिचा फोटो अजूनही तिथेच होता. मराठमोळ्या वेशातील माझ्या मैत्रिणीचा सुंदर फोटो त्या टुकार माणसाच्या वॉलवर पाहून मला फार वाईट वाटले.  त्याला काही लोकांनी लाइक्स देऊन कमेंटही केले होते. मी त्या फोटोचा स्पॅम रिपोर्ट फेसबुकला केला. पण काहीही उपयोग झाला नाही.

मैत्रिणींनो यावरून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते,
तुम्ही तुमचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत असाल तर ते फक्त तुमच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांनाच दिसतील अशी सेटिंग करा. मोबाइलवरून पोस्ट करत असाल तर  पोस्टच्या उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतील, त्या डॉट्सवर टॅप करून एडिट प्रायव्हसी हे ऑप्शन सिलेक्ट करून, आलेल्या लिस्टमधून फ्रेंड्स ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्ही पोस्ट केलेले फोटोज फेसबुकवरील तुमचे मित्र मैत्रिणी फक्त पाहू शकतील. कारण एखादा फोटो पब्लिकली पोस्ट केला गेल्यास तो कोणीही बघू शकते आणि शेअरही करू शकते. शेअर हे ऑप्शन डिसेबल करण्यासाठी फेसबुकमध्ये सध्यातरी कुठलाही उपाय नाही. तर सावध राहा आणि सोशल मीडियाचा सांभाळून वापर करा.

कविता दातार
सायबर सेक्युरीटी कंसल्टंट

Sunday, 8 April 2018

खाजगी माहिती चे व्यापारीकरण

खाजगी माहिती चे व्यापारीकरण

आपल्यापैकी बहुतेक जण सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात. स्मार्टफोन्सचा वापर सुद्धा गेल्या काही वर्षात वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे होणारे फायदे जसे अनेक आहेत, तसे तोटे देखील आहेत. यात अधोरेखित करता येण्याजोगा तोटा म्हणजे तुमच्या खासगी माहितीचे व्यापारीकरण. एकदा का आपण सोशल नेटवर्किंग साइटवर अथवा एखाद्या स्मार्टफोन अॅपवर आपल्याबद्दलची माहिती लिखित किंवा फोटो, व्हिडीओच्या स्वरूपात टाकली, कि ती माहिती खासगी राहू शकत नाही.

कुठल्याही वेबसाइट किंवा अॅपचे दोन प्रमुख आर्थिक स्रोत म्हणजे जाहिराती आणि  वापरकर्त्यांची माहिती (users' data). बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या कंपनी, संस्था, शॉपिंग अथवा मार्केटिंग साइट्स कडून ई-मेलस् येतात. आपला ईमेल आयडी त्यांना कुठून मिळतो? याचा विचार केला तर आपल्या लक्षात येइल कि आपला इमेल आयडी यांना पुरवला जातो. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे भारतात वीस कोटी युजर्स आहेत. दिवसागणिक यात वाढ होत आहे.  लोकप्रियतेमुळे अनेक मार्केटींग कंपनी फेसबुकच्या यादीत आहेत. यावरून यूजर्स डेटाची उलाढाल किती प्रचंड प्रमाणात आहे याचा अंदाज येऊ शकतो. आज फेसबुकचे मार्केट कॅपिटल साधारणतः  साडेचारशे ते पाचशे अब्ज डॉलर्स एवढे आहे. असे म्हणतात की कुठलीही सेवा जर आपल्याला विनामूल्य मिळत असेल तर त्यात आपणच प्रॉडक्ट असतो.

केंब्रिज अॅनालिटिका कंपनी प्रकरणाने यावर नव्याने प्रकाश टाकला गेला आहे. या प्रकरणात तर फेसबुकवरील एका अॅपच्या द्वारे युजर्सचा डेटा फेसबुकच्या नकळत चोरून केंब्रिज अॅनालिटीका कंपनीला अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणूक अभियानासाठी विकला गेला.

फेसबुकच्या सेटींग्स मध्ये "Download a copy of your Facebook data" असे लिहिलेली एक लिंक आहे. ती लिंक वापरून फेसबुकवरील आपला सुरुवातीपासूनच डेटा डाऊनलोड करता येतो यात वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ, मेसेजेस, वॉल पोस्ट्स, आपल्या फ्रेंडलिस्टमधील लोकांचे ई मेल आयडी आणि मोबाईल नंबर असं सगळं काही मिळतं. एक साधारण हॅकर किंवा ज्याला आपला पासवर्ड माहीत असेल अशी व्यक्ती हा डेटा सहज मिळवू शकते. फेसबुकच नाही तर गुगल-प्लस, लिंक्डइन, ट्विटर आणि इतर कुठलीही वेबसाइट या प्रकारे आपल्या डेटाचा वापर करतात.

एवढेच नाही तर स्मार्टफोनच्या अँड्रॉइड, आयओएस या सारख्या ऑपरेटिंग सिस्टम्स सुद्धा आपल्या स्मार्टफोनवरील सगळा डेटा त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर करून ठेवतात. त्यांचा सर्व्हर हॅक झाल्यास आपल्या डेटाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते.

यावरून असं म्हणता येइल की आपल्या लिखित, फोटो आणि व्हिडिओ स्वरूपातील वैयक्तिक माहितीची विक्री, चोरी आणि दुरुपयोग शक्य आहे.

खासगी माहितीचे व्यापारीकरण पूर्णपणे टाळता येणे आजच्या काळात शक्य नसले तरीही काही गोष्टींची खबरदारी  आपण घेऊ शकतो.
-शक्यतोवर मोबाईल नंबर कुठल्याही वेबसाइटवर शेअर करणे टाळावे.
-खासगी आयुष्याबद्दलची सुक्ष्म माहिती, फोटो, व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करणे टाळावे. जुजबी माहिती फक्त पोस्ट करावी.
-सोशल मीडिया वापरत असताना त्यावरील दुसरे अनधिकृत अ‍ॅप वापरू नये. उदा. फेसबुकवर मल्लू अ‍ॅप सारखे अ‍ॅप्लिकेशन.
-आपले बँक खाते, पैसे, दागिन्यांविषयीची कसल्याही प्रकारची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.
-स्मार्टफोनवर खासगी क्षणांचे फोटो, व्हिडिओ शक्यतो चित्रित करू नये, त्याऐवजी वैयक्तिक कॅमेराचा वापर करावा.
-स्मार्टफोनवर वापरत असलेल्या अॅप्सना जरुरी तेवढ्याच परमिशन्स द्याव्या.
-लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर हॅकिंग किंवा तत्सम गोष्टींपासून वाचण्यासाठी आणि डेटाच्या सुरक्षेसाठी चांगले इंटरनेट सिक्युरिटी अँटी व्हायरस वापरावे.


कविता दातार
सायबर सेक्युरीटी कंसल्टंट

Thursday, 22 March 2018

फेसबुक डेटा लीक प्रकरण

फेसबुक डेटा लीक प्रकरण 

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेसबुकला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. #DeleteFacebook चे आवाहन जगभरातून जोर धरत आहे. हे आवाहन व्हॉट्सअॅप चा सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन याने जगभरातील लोकांना केले आहे.  अमेरिका आणि कॅनडात एक कोटी युजर्सने आपली फेसबुक अकाऊंट्स डिलीट केली आहेत. भारतात हा आकडा लाखांच्या घरात असेल.
२०१६ मध्ये अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून अप्रत्यक्षपणे  लीक झाली होती.  विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इलेक्शन कॅम्पेन हाताळणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी होती केंब्रिज अॅनालिटिका. ही इंग्लंडमधील एक मोठी डेटा अॅनालिटिक्स कंपनी आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीत शिकणार्‍या अलेक्झांडर कोगन याने एक पर्सनॅलिटी क्विझ अॅप या कंपनीच्या मदतीने डेव्हलप करून फेसबुकमध्ये सामील केले.   खरे तर फेसबुकवर असे बरेच अॅप्स तुम्ही वापरले असतील. उदाहरणा दाखल "तुम्ही मागच्या जन्मी कोण होता?", "कुठल्या सेलिब्रिटीशी तुमचा चेहरा मिळतो?" किंवा "तुमचे खरे प्रोफेशन काय असायला हवे?" वगैरे. हे अॅप्स वापरताना तुमची परमिशन घेऊन तुमचा डेटा एक्सेस केला जातो.  तर या कोगन महाशयांनी अशा रीतीने पाच कोटी युजर्सचा डेटा मिळवून केंब्रिज अॅनालिटिकाला पुरवला. 
या डेटामधील युजर्सचे पॉलिटिकल व्ह्यूज, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे वैयक्तिक मतं, अपेक्षा या सगळ्याचा अभ्यासपूर्वक वापर करून ट्रम्प यांच्या इलेक्शन कॅम्पेन ची आखणी करण्यात आली, असा आरोप आहे. या सगळ्यांत फेसबुकचा प्रत्यक्ष संबंध नसताना नुकसान मात्र त्यांनाच सोसावे लागत आहे. फेसबुकचे मार्केट कॅपिटल ५० अब्ज डॉलर्सने घटले आहे. लाखो लोक फेसबुकवरून आपले अकाउंट डिलीट करत आहेत. काही देशात फेसबुकची चौकशी सुरू आहे. फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. भारतात फेसबुकचे वीस कोटी युजर्स आहेत. हा आकडा एकूण युजर्सच्या दहा टक्के आहे. म्हणूनच कदाचित भारतीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्याने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर माफी मागितली आहे आणि फेसबुकवरील सुरक्षा प्रणाली अजून जास्त अद्ययावत  करण्याची हमी दिली आहे. जेणे करून अशा प्रकारचे युजर्स डेटा लीक भविष्यात टाळता येतील.

कविता दातार
Cyber Security Consultant

Monday, 22 January 2018

मृगजळ

नेहा एक निम्न मध्यमवर्गीय परिस्थितीतील सामान्य रंग रूपाची आणि बुद्धीची बारावी कॉमर्सला शिकणारी मुलगी. मुंबईतील धारावीमध्ये छोट्या दोन रुमच्या ब्लॉकमध्ये ती, तिचे एका बँकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे वडील, आई आणि एक लहान भाऊ राहत होते. नेहाला कॉलेजमध्ये फारसे कोणी मित्र मैत्रिणी नव्हते. याला कारण तिचा एकलकोंडा, अबोल स्वभाव. छान कपडे घालावेत, स्टायलिश राहावं, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात रमावं, आपल्यालाही एक खास मित्र असावा, असे तिला फार वाटे. पण एकंदर परिस्थितीमुळे तिचे हे मनोरथ मनातच विरून जात. समवयस्क मुला मुलींना हास्य विनोद करताना पाहून तिला फार असूया वाटे. आपल्या परिस्थितीची चीड येई. आणि ती अजूनच अंतर्मुख होत असे. एक प्रकारचा न्यूनगंड तिच्यात वाढीस लागला होता.
कधी नव्हे ते नेहा आज खुशीत होती. त्याला कारणही तसेच होते. गेले दोन महिने ती तिच्या बाबांना एक सेकंडहँड स्मार्टफोन घेऊन द्या म्हणून सांगत होती. आज त्यांनी तिच्यासाठी आपल्या बँकेतील एका सहकाऱ्याचा दोन वर्ष जुना स्मार्टफोन उधारीवर खरेदी केला होता. थोडे थोडे करून ते त्या सहकाऱ्याला पैसे देणार होते. मोठ्या अपूर्वाईने तिने बाबांच्या हातून फोन घेतला. उलटपालट करून पाहिला. हात रुमालाने स्वच्छ पुसला आणि जुन्या साध्या मोबाइल फोनमधील सिमकार्ड काढून त्या  स्मार्टफोन  मध्ये घातले. फोन सुरू केल्यावर त्याच्या स्क्रीनवरील रंगबिरंगी आयकॉन्स ती अनिमिष नेत्रांनी बघू लागली. बाबांकडून थोडे पैसे घेऊन जवळच्या दुकानात जाऊन तिने नेटपॅक विकत घेतला. घरी येऊन तिने व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर असे अॅप्स मोबाइल फोनवर इन्स्टॉल केले. फेसबुकवर तिने स्वतःचे अकाऊंट तयार केले. आणि त्यावर प्रोफाइल फोटो म्हणून ऐश्वर्या या प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्रीचा सुरुवातीच्या काळातला फोटो लावला. तिच्या बरोबर शिकणाऱ्या काही मुला मुलींना फेसबुकवर शोधून तिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही दूरस्थ, अनोळखी मुलांची नावं अंदाजे टाइप करून त्यांनाही तिने फ्रेंड रिक्वेट पाठवली. यातील एक होता क्रिश जॉन्सन.
                                    ******

क्रिश त्याच्या ऑस्ट्रेलियातील सिडनी मधील घरात लॅपटॉपवर कॉलेज असाइनमेंट पूर्ण करण्यात गढून गेला होता. मोबाईल फोनवरील नोटिफिकेशन साउंडने त्याची तंद्री भंग पावली.  त्याने मोबाईल उचलून पाहिला फेसबुकवर एक नवी फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. साहजिक कुतुहलाने त्याने रिक्वेस्ट पाठवणाऱ्या व्यक्तीचा प्रोफाइल उघडून पाहिला. "wow ! beautiful !!" प्रोफाइल वरचा फोटो पाहताच त्याच्या तोंडून सहजोद्गार निघाले. लगेच त्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि फेसबुक मेसेंजरवरून मेसेज पाठवला. "Hi ! thanks for the request. You are very beautiful. what's the meaning of your name ? Neha ?" मेसेंजरचा नोटिफिकेशन साऊंड एेकताच  नेहाने मेसेज बॉक्स उघडला. क्रिशचे प्रोफाईल पाहून आणि मेसेज वाचून ती रोमांचित झाली. आयुष्यात प्रथमच कोणीतरी, त्यातही एका हॅण्डसम फॉरेनर मुलाने तिची स्तुती केली होती. नेहा हरखून गेली. लगेच तिने त्याला रिप्लाय केले. "Hi ! thanks. Meaning of my name is Love." यानंतर त्या दोघांनी जवळपास अर्धा तास चॅटिंग केले. क्रिशने तिला स्वतःबद्दल बरंच काही सांगितलं. सिडनीमध्ये तो इंटरनॅशनल फायनान्स या विषयात ग्रॅज्युएशन करत होता. त्याच्या वडिलांची सुपर शॉप्सची चेन होती. त्याची आई भारतीय असून मुंबईतील होती. बावीस वर्षांपूर्वी ती ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी आली असताना क्रिशच्या वडिलांशी तिची भेट झाली आणि त्यांनी लग्न केले. दोन वर्षांनी क्रिशचा जन्म झाला. क्रिश हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याला त्याच्या आईची जन्मभूमी मुंबईत एकदा भेट देण्याची इच्छा होती. नेहाने तिचे आई वडील डॉक्टर असल्याचे क्रिशला खोटेच सांगितले. क्रिश सोबत चॅटिंग केल्यापासून नेहा जणूकाही हवेत तरंगत होती. तिला या सगळ्याचे खूपच अप्रूप वाटत होते. एक प्रकारच्या आभासी जगात ती विहरत  होती. त्यानंतर रोजच किमान एकदा ती दोघं फेसबुक मेसेंजरवर भेटू लागली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले. क्वचित कधितरी क्रिश तिला फोन कॉल सुद्धा करायचा. अशातच क्रिशने तिच्यावरच्या त्याच्या प्रेमाची कबुली दिली. नेहाला आभाळ कवेत आल्यासारखे वाटू लागले. तिला जणू स्वर्ग दोन बोटे उरला. क्रिशने नेहाला तिचे अजून काही फोटो पाठवायला सांगितले. तिने ऐश्वर्याचे काही काळापूर्वीचे फोटो इंटरनेट वर शोधून त्याला पाठवले. हे आभासी जगच तिला खरे वाटू लागले. तिच्या मनात कायम क्रिशचेच विचार असायचे. हळू हळू अभ्यासातील तिचे लक्ष उडाले. घरातील कामात आईला मदत करताना छोट्या छोट्या चुका होऊ लागल्या. कधीतरी तिला वाटे की क्रिशला सगळं खरं सांगून टाकावं आणि आपला खरा फोटो सुद्धा पाठवून द्यावा. पण एकदा चॅटिंग करताना तिने क्रिशला विचारले, "which quality of mine impress you the most ?" क्रिशने लगेच उत्तर दिले , "Your divine beauty.."
हे ऐकल्यावर तिने त्याला खरं सांगायचा विचारही सोडून दिला. या मृगजळा पासून दूर जाण्याची तिची इच्छा नव्हती. ती या सगळ्यांत अधिकच गुंतत चालली होती.

डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा होता. आज नेहाला थोडी कणकण असल्याने ती कॉलेजला न जाता घरी आराम करत होती.  दुपारचे तीन वाजले होते. तिने मोबाइलवर मेसेंजर उघडून पाहिले क्रिश ऑफलाइन होता. तिच्या लक्षात आले, ऑस्ट्रेलियात आता रात्रीचे साडेआठ वाजले असणार आणि क्रिश सॅटर्डे नाईट आऊटसाठी बाहेर असणार. तिने सहज जीमेल बॉक्स उघडला. त्यात क्रिशने काही तासांपूर्वी पाठवलेले मेल दिसत होते. अधीरतेने तिने मेल वाचायला सुरुवात केली.

Dearest Neha,
Here is a big surprise for you. I am coming to Mumbai on Friday, 29th December. I am eager to meet the most beautiful girl in the world.

पुढे त्याने त्याच्या फ्लाइटचे आणि हॉटेल बुकिंगचे डिटेल्स दिले होते आणि नेहा त्याला मुंबईत आल्याबरोबर एअरपोर्टबाहेर दिसावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. क्रिशची ममा जरी मुंबईतील होती तरी अॉस्ट्रेलिअन माणसाशी लग्न केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी काही संबंध ठेवले नव्हते. त्यामुळे क्रिश हॉटेलमध्ये राहणार होता. भारतात खास करून मुंबईला भेट देण्याची त्याची इच्छा माहित असल्याने त्याच्या ममा डॅडकडून त्याला सहज संमती मिळाली होती.  ईमेल वाचताना नेहाचे हात थरथरत होते. घशाला कोरड पडली होती. कशीतरी उठून माठाजवळ जाऊन ती दोन तीन ग्लास पाणी प्यायली. काहीतरी मौल्यवान असे हातातून निसटून चालले आहे या वैफल्याने आणि खोटेपणाच्या दडपणाने ती खूप अस्वस्थ झाली. तिने क्रिश च्या मेलला काही उत्तर न देता, त्याला कुठलाही मेसेज न पाठवता मोबाईल स्विचऑफ करून कपाटाच्या आतल्या खणात ठेवून दिला आणि घरात अस्वस्थपणे येरझारा घालत विचार करू लागली, 'आपलं खरं रंगरूप, परिस्थिती क्रिशला समजल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल ? तो नक्कीच आपला तिरस्कार करेल. कदाचित आपल्या घरच्यांना भेटून आपला खोटेपणा उघडकीस आणेल. अरे देवा !! हे काय होऊन बसलं ?  त्याला आपण मुंबईच्या बाहेर जातो आहोत असं खोटं सांगू यात का ? पण त्याचा काय उपयोग ? कधी ना कधी तो इथे येणारच.'  खूप विचारांती नेहाने त्याच्याशी पूर्णपणे संपर्क थांबवण्याचे पक्के ठरवले. अगतिकतेने तिचे डोळे भरून आले.
                                  ******
सहार एअरपोर्टच्या सर्व्हिस काउंटरवर आपले ई टुरिस्ट व्हिसा डॉक्युमेंट दाखवून बाकी औपचारिकता पूर्ण करून क्रिश बाहेर आला आणि उत्सुकतेने नेहा कुठे दिसते का ? ते पाहू लागला. चार दिवसांपासून नेहाने त्याच्या मेसेजेस, ईमेल आणि फोन कॉल्सला उत्तर दिले नव्हते त्यामुळे त्याला तिची काळजी वाटत होती. ती बरी असेल ना? कि तिचा मोबाइल हरवला असेल? अशा अनेक शंका त्याच्या मनात येत होत्या. काही झाले तरी मुंबईत येऊन नेहाला भेटण्याचे त्याने नक्की ठरवले होते. बराच वेळ तिची वाट पाहून, तिला पुन्हा पुन्हा कॉल करूनही काही उत्तर येत नव्हते. कंटाळून क्रिश टॅक्सी करून, इंटरनेट वरून बुक केलेल्या, हॉटेलच्या रूमवर आला. साडे चौदा तासांच्या प्रवासाने तो खरं तर दमला होता. त्याला जेटलॅग  ही जाणवत होता फ्रेश होऊन त्याने थोडी झोप घेण्याचे ठरवले. दोन तास झोपून उठल्यावर त्याने नेहाला परत कॉल केला. यावेळेस दोन तीनदा रिंग वाजून कॉल डिस्कनेक्ट झाला. परत कॉल केल्यावर मोबाइल स्विच अॉफ असल्याचा ऑपरेटरचा मेसेज आला. नेहाशी कसा संपर्क साधावा ? हे त्याला कळत नव्हते. त्याच्या जवळ तिच्या घराचा किंवा कॉलेजचा पोस्टल अॅड्रेस सुद्धा नव्हता. आता क्रिशला नेहाचा संशय येऊ लागला. त्याला स्वतःच्या मूर्खपणाची चीड आली. गुगलवर 'नेहा शर्मा मुंबई' असे टाकून त्याने तिच्या बद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली. पण त्याला तिच्या फेसबुक प्रोफाइल शिवाय तिच्या माहितीशी जुळणारं असं काही मिळालं नाही. नेहाने तिच्या खोलीतून समुद्र दिसतो असे सांगितल्याचे त्याला आठवले म्हणून त्याने बीचेसच्या आजूबाजूच्या रहिवासी भागात टॅक्सीतून फिरून तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याला सापडणं  शक्यच नव्हतं. तेथील काही लोकांना त्याने तिचा मोबाईलवरील फोटो दाखवून ही मुलगी कुठे राहते ? असं विचारल्यावर ती लोकं त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. त्यातील एकाने त्याला सांगितले की ही बॉलिवूड  फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या आहे. ते ऐकून क्रिशला प्रचंड धक्का बसला.
नेहाने आपल्याला मुर्ख बनवले अशी त्याची खात्री पटली. त्याने मुंबई पोलीस सायबर सेलची मदत घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने सायबर सेलला ऑनलाइन कम्प्लेंट दिली. कम्प्लेंट देऊन दोन दिवस झाले तरीही त्याला सायबर सेल वरून कुठलाही रिप्लाय आला नव्हता.
त्याच्या डॅडने त्याला काही मदत लागली तर संपर्क करता यावा यासाठी मुंबईतील ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट मधील आपल्या एका मित्राचा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. त्याच्या ममानेही तिच्या एका मुंबईतील मैत्रिणीचा फोन नंबर आणि पत्ता त्याला दिला होता. त्या दोघांनाही फोन करून त्याने सगळं सविस्तर सांगितलं. त्याचे मुंबईत येण्याचे प्रयोजनही सांगितले. दोघांनीही त्याला मदत करण्याचे मान्य केले. त्याच्या आईची मैत्रीण, त्याच्यासोबत मुंबईतील बीकेसी रोडस्थित सायबर सेल  पोलिस स्टेशनमध्ये आली. तेथील  सायबर सिक्युरिटी  एक्सपर्ट ने क्रिशच्या मोबाइलवर मेसेंजर थ्रू येणारे मेसेजेस तपासले. मेसेजेस ज्या डिव्हाइसवरून आले होते त्याचे लोकेशन बांद्र्याच्या आसपासचे दिसत होते. पण आता ते डिव्हाइस वापरात नसावे असे वाटत होते.   त्याच्या डॅडच्या ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट मधील मित्राने आपली ओळख वापरून पोलिसांना ते ठिकाण शोधून काढण्याची विनंती केली. पुढच्या तीन चार दिवसांत पोलिसांनी मोबाइल चे कॉल डिटेल्स वापरून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून नेहाचा पत्ता शोधून काढला. नेहाला तिच्या आई वडिलांबरोबर पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. नेहाला पाहून क्रिश आश्चर्य चकित झाला. इतकी सर्वसामान्य मुलगी अशी फसवणूक करेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. सर्व प्रकार कळल्यावर नेहाचे वडील डोक्याला हात लावून खुर्चीत कोसळले. तिची आई रडायला लागली. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती मान खाली घालून उभी होती. आज ती  कोणाशीही नजर मिळवू शकत नव्हती. धरणीने दुभंगून आपल्याला पोटात घ्यावं असं तिला वाटत होतं. क्रिश बरोबर आलेली त्याच्या आईची मैत्रीण नेहावर खूप संतापली होती. "काय केलंस तू हे ?? एका मुलाच्या आयुष्याशी खेळताना तुला लाज कशी नाही वाटली?" क्रिश नेहा जवळ जाऊन पाणावलेल्या डोळ्यांनी एवढंच म्हणाला, "You cheated me. you badly played with my emotions. but please don't do this again to anybody." पोलिसांनी नेहाच्या वडिलांना सांगितले की क्रिशने नेहाविरुद्ध कम्प्लेंट फाइल केल्यास तिला १ ते ३ वर्षांची शिक्षा आणि पंचवीस ते पन्नास हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. पण क्रिशचा टुरिस्ट व्हिसा तीसच दिवसांचा  असल्याने आणि तसेही त्याला आता इथे जास्त दिवस थांबण्याची  इच्छा नसल्याने त्याने नेहा विरुद्ध  कंप्लेंट दिली नाही. पोलिसांनी नेहाला समज देऊन सोडून दिले. 
                                   ******
आज दहा दिवसांनी क्रिश मुंबई हून सिडनीला जड मनाने, एक दुस्वप्न सोबत घेउन निघाला होता. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी.